Saturday, August 13, 2022

ट्रेक वासोटा ऊर्फ व्याघ्रगड


           ऑफिसमध्ये लंच टेबलवर सागर, अस्मिता , कुंदन सोबतच त्या दिवशी नवीन मेम्बर होती, दीपा ... अस्मिताच्या टिममधली बीए (Business Analyst). असंच जेवत असताना नेहमीच्या गप्पा-टप्पा सुरु होत्या, तेव्हा दीपाने weekendचा विषय काढला. बाकी कुणाकडे काही खास सांगण्यासारखं नव्हतं. तिने मग तिचं सांगितलं , ती एक ग्रुपसोबत देवकुंड धबधब्याची सहल करून आली होती. पुणे ते पुणे सर्व नियोजन त्या गृपनेच केलं होतं... तिने आणखी थोडी माहिती दिली, आणखी कोणकोणत्या सहलींचे प्लॅन करतात वगैरे, उदा. मालवण-तारकर्ली , हरिश्चन्द्रगड, वासोटा. मालवण वगैरे ठीक आहे, पण दुसरी २ नावे ऐकताच माझे कान टवकारले ...हरिश्चन्द्रगड आणि वासोटा ट्रेक करायची बऱ्याच दिवसांची इच्छा राहिली होती...  

          दीपाने सांगितल्याप्रमाणे मी इंस्टाग्राम ला जाऊन ग्रुपची माहिती काढली, संपर्क साधला. हरिश्चन्द्रगड ट्रेक नळीच्या वाटेने आहे कळल्यावर तो प्लॅन रद्दच केला (ती ३ वाटांमधली सगळ्यात अवघड वाट मानली जाते) आणि वासोट्याची माहिती काढली.प्लॅन इंटरेस्टिंग वाटला. सुम्या+सायली नवविवाहित दाम्पत्य असल्या कारणाने जास्त काही विचारणं योग्य वाटलं नाही, सुहया फिलिपिन्सला होता, योग्याला बहुतेक विचारलं नव्हतंच..घरात लहान बाळ असल्यामुळे...अजून कुणाला विचारायच्या फंदात न पडता..ऑर्गनायझरना संपर्क साधून, त्यांनी सांगितल्याप्रमाणे (दोघांचे.... बायको आणि मी ) निम्मे पैसे जमा केले आणि उरलेले प्रवास सुरु होताना द्यायचं ठरलं. 

        काय घ्यायचं , काय नाही ह्याची यादी त्यांनी तर दिलीच होती, पण ट्रेकिंगचा तसा अनुभव असल्याने आवश्यक वस्तू काढून ठेवल्या होत्या. मुख्य म्हणजे डिसेंबर असल्याने आणि मुक्काम करायचा असल्याने उबदार कपडे , ब्लॅंकेट गरजेचं होतंच. सुका खाऊ, पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्या. 

(शास्त्रानुसार निघताना काढलेला सेल्फी)

 २२ डिसेंबर, रात्री ८.३० ला शिवाजीनगर वरून पिकअप होता. मी आणि बायको ८-८.१५ च्या आसपास बँक ऑफ महाराष्ट्र्च्या गेटवर येऊन थांबलो. कॉल करून चौकशी केली असता, on the way आहोत.. लवकरच पोहचतोय असं उत्तर आलं. शिवाजीनगरचा पहिला पिकअप होता आणि दुसरा स्वारगेटला नटराज हॉटेलला. आम्ही उभे होतो तिथे असपास ७-८ जा बॅगा घेऊन उभे होते. ९च्या आसपास एक बस असली, तशी मोकळीच होती. एक जण Organizers मधला बसमध्ये चढला , मग पाठोपाठ जे आजूबाजूला उभे होते ते सुद्धा बसमध्ये चढून बसले. १० मिनिटे थांबून, त्या पिकअप पॉईंटचे सर्वजण आलेले चेक करून गाडी निघाली, पुढच्या पिकअपला नटराज हॉटेल, स्वारगेट. 

 रात्रीचे साडेनऊ झाले असतील, जेव्हा स्वारगेटला होतो, पण एक-एक जण येता येता साडे-दहा वाजून गेले. तिथूनच १२-१२.३० ला पोहचुन झोपायचा प्लॅन फिसकटणार वाटू लागलं. शिवापूर टोलनाका क्रॉस केल्यावर ऑर्गनायझर मधला सागर उठला आणि मरगळलेल्या सगळ्यांना जागं करायला म्हणून 'अंताक्षरी'चा खेळ सुरु केला. कुणी नवीन, कुणी जुनी गाणी म्हणत खेळ चांगलाच रंगला. रात्र जसजशी वाढू लागली, एक एक शान्त होऊ लागला. साताऱ्याच्या अलीकडे एका पेट्रोलपंपवर गाडी थांबली. सर्वजण फ्रेश होऊन बसले. मग जे गाडी सुटली आणि मलाही झोप लागली ते थेट गारवा जाणवू लागल्यावर जाग आली. घाट सुरु होता. कोयनेच्या 'शिवसागर'च्या आसपास होतो. २ वाजले मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायला. कुठलीशी वाडी होती..नाव विसरलो आता.. 

('सौं.'चा फोटोचा हट्ट आणि काय)
         समोरच १०० मीटरवर पाणी दिसत होतं, लांब पसरलेलं.. ३ बाजूंनी डोंगर आणि झाडी. तिथंच ५-६ खोल्या, २-३ बाथरूम-टॉयलेट आणि आधीच सांगितल्याप्रमाणे तंबू लागून तयार होते. दरम्यान, ट्रेकसाठी आलेल्या सर्वांनी आपापले तंबू सामान टाकून नक्की केले. आम्हा  दोघांचा तंबू अगदीच मध्यावर होता, समोर एक मोठं झाड, त्यापलीकडे १५-२० पावलांवर पाणी. भलेही आवरा-आवरीमध्ये २.३० झाले, कुणी झोपायच्या मूडमध्ये दिसत नव्हतं. कुणाचं फोटो काढणं, कुणाचं कॅरम खेळणं चालू होतं. इतक्यात Organizersनी शेकोटी पेटवली, मग काय डिसेंबरच्या थंडीने कुडकुडणारी जनता शून्य मिनिटांत शेकोटीभोवती गोळा झाली. 
(रात्री शेकोटीभोवती जमलेलो)
 
  पण सकाळी लवकर उठायच्या इंस्टक्शन्स आल्याने, हळूहळू गर्दी पांगली .. सगळे झोपायला आपापल्या टेन्टकडे चालते झाले. आम्ही ३-३.१५ च्या आसपास निद्रेच्या अधीन झालो. 
(झुंजूमुंजू होताना)
          सकाळी ६.३० ला बाहेर हालचाल, कुजबुज ऐकू यायला लागली तशी आम्हाला जाग आली. टेन्टचा दरवाजा उघडला, तर आहाहा! काय सुरेख दृश्य नजरेस पडलं. टेंटच्या कमानीतून समोरचा डोंगर, त्यावरची गर्द झाडी, अलीकडे पाणी त्यावर पसरलेलं धुकं... आणि एक दोन बोटी बांधून ठेवलेल्या.. फक्त पाहतच रहावं असं ...पण आजूबाजूच्या गडबडीने पुन्हा भानावर आलो आणि प्रात:विधींसाठी मागील खोल्यांकडे निघालो.
(सकाळचा नाष्टा )
हात-पाय-तोंड धुवून आणि फक्त अंघोळीची गोळी खाऊन, वेळ निभावून नेण्याचा प्रस्ताव बायको आणि मी बहुमताने पास करून नाश्त्याच्या रांगेत जाऊन उभा राहिलो . नाष्ट्याला पोहे आणि चहा होता ... तसा चवीला so-so च म्हणू (अमृततुल्यची चटक लागलेल्याना वाटणारच असं म्हणू नका) पण त्या वातावरणात ते गरमागरम पोहे आणि वाफाळलेला चहा पिताना मजा आली....
(ओळख परेड)
        साधारणतः ८.३० च्या आसपास ऑर्गनायझर्स नी सर्वांना एकत्र बोलावून, राऊंड करून उभे केलं. त्यांचे मुख्य लोक्स विभा, सागर, विशाल इत्यादींनी आपापला intro करून दिला. इतरांनीही आपापली ओळख सांगितली, त्यावेळी ४-५ चेहरे रात्रीतून वेगळे दिसले. त्यांनी ओळख करून देताना बारामतीहून आल्याचं सांगितलं. ते ऐकताच अस्मादिकांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर हास्य उमललं. दरम्यान, सौ.च्या नजरा माझ्यावरच होत्या. हसत-हसत hmm hmm चालूच होतं. बरं ...तर ऑर्गनायझर्सनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. आणि दुपारच्या जेवणाची सोय म्हणून थेपल्यांची पाकिटे वाटली आणि एनर्जी ड्रिंक म्हणून Boat चे पाऊच वाटले. हे सर्व सुरु असतानाच २ बोटी बाजूला तयार होऊन उभ्या होत्याच. आणि थोड्याच वेळात वासोट्याच्या दिशेने बोटी मार्गस्थ झाल्या.

         हा बोटींचा प्रवास सुरु झाला खरा ... पण थोड्याच अंतरावर जाऊन आमची बोट भर पाण्यात जाऊन मध्येच थांबली ... नक्की काय झालं ठाऊक नाही आजपण .. पण बहुतेक दुसरी बोट भलतीकड़ेच गेली होती... थोड्या वेळाने दोन्ही बोटी एकत्र आल्या आणि प्रवास पुनःश्च सुरु झाला. उजवीकडे दूर बामणोलीच्या खुणा वाटत होत्या... तिथलं जवळचंच श्री. दत्तात्रेयांचं मंदिर असलेलं बेट दिसत होतं.. २०११च्या सहलीच्या आठवणी काही क्षण जाग्या झाल्या...पाण्यात अथवा छोट्या बेटांवर जी झाडे दिसत होती , ती जरा विचित्र वाटत होती. जवळपास अर्धी झाडे पिवळी होती आणि वरचा भाग हिरवागार. बहुतेक पावसाळ्यात जेव्हा धरणाचं पाणी वाढतं आणि इथली पाणी पातळी वाढते तेव्हा ही झाडे पाण्यात राहत असणार .. २-३ महिने किमान, त्यामुळे ती अशी दिसत असावीत. 

(इथून खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरुवात होते)
         एका मागोमाग एक टेकड्या पार करत, मजल-दरमजल करत अखेर समोर वासोटा दिसू लागला. आणि काही मिनिटांत बोटी जिथे लागतात तिथे पोहचलो, पटापट सगळे उतरून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कमानीखाली जमा झालो. सगळ्या ग्रुपचा एकत्र फोटो काढून, वनविभागाच्या तिकीट खिडकी /प्रवेशद्वारापाशी येऊन थांबलो. तिथली गर्दी बघून तर माझे डोळेच फिरले...सिंहगड, लोहगडला लाजवेल अशी गर्दी होती. 'वासोटा' दुर्गमगड आहे...निर्जन आहे... वगैरे बऱ्याच वर्षांपासून ऐकून होतो पण माझे समज मागे पडले. 

         जवळपास पाऊण-एक तासाच्या प्रवेशद्वाराच्या कंटाळवाण्या थांब्यानंतर अखेर ट्रेक सुरु झाला...त्यातल्या त्यात तिथे ग्रुपचं थोडंसं स्ट्रेचिंग करून घेतलं हीच काय ती जमेची बाजू... सुरुवातीला काहीशा विरळ झाडाझुडपांनंतर.. एक ओढा लागला... पावसाळ्यात भरपूर पाणी असत असणार , अशा खुणा जाणवत होत्या ..ठिकठिकाणी अधे-मध्ये थोडं पाणी होतं तसं.. आणि ओढ्यातल्या गोल-गरगरीत दगडांमुळे फोटो काढायचा स्पॉट मिळाला होता खरा.. काही मंडळींचं चालू होतं फोटोसेशन.. आम्ही मात्र काढता पाय घेतला.. 

(ट्रेकच्या सुरुवातीला लागणारं मारुती मंदिर)

लगेचच पुढे हनुमानाची दगडात कोरलेली शेंदूर लावलेली मूर्ती दिसते.. पाया पडून ट्रेक सुरु ठेवला .. आता काहीशी दगड-गोट्यांमधली बनलेली वाट होती आणि झाडांची गर्दी वाढली होती...प्रचंड मोठी झाडे आणि त्यावर लांबच लांब पसरलेल्या वेली  ... अशातून आमचा प्रवास सुरु होता. काही वेळाने पायऱ्या लागतात... तिथेही अशाच घनदाट जंगलातून जावे लागते... डिसेंबर जरी असला तरी चांगलाच घाम निघत होता... त्यात ट्रेकची सवय मोडलेली...थांबत बसत..ट्रेक सुरूच होता...

 ग्रुपमध्ये सगळ्या प्रकारची जनता होती. हौशी-गौशी.. हाडाचे ट्रेकर .. त्यामुळे ग्रुप विखुरला होता, काही अगदीच पुढे .. काही अगदीच मागे.. अधून मधून आमचं पण फोटो सेशन चालू होतंच म्हणा... ऑर्गनायझर्स मधील लोक divide झाले होते. काही सर्वांत पुढे .. काही शेवटच्यांना सोबत न्यायला मागे..  वाटेत एक स्पॉट आहे, भला मोठा खडक आहे, तिकडे चढून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. 

(कितीही दमलेला असलं तरी फोटोसाठी हसायला लागतं भाऊ)

        भलेही दमछाक होत होती, घामेजलो होतो पण ती जंगलातील वाट, झाडी, मधूनच दिसणारे डोंगर आणि वासोटा सर करायची ओढ.. नवी उमेद देत होते आणि आता आम्ही 'वासोटा' नावाची बाणाकृती पाटी लावलेल्या ठिकाणी पोहचलो. तिथे त्या पाटीबरोबर फोटो काढला हे वेगळं सांगायची गरज नाही. 

       जंगल संपून आता चढण चढून थांबलो आणि मागे वळून बघितलं तर लक्षात आलं, बरंच अंतर पार केलंय. 'शिवसागर' जलाशय बराच दूर दिसत होता आणि मधल्या घनदाट अंदाज आला. आता ट्रेकचा शेवटचा टप्पा होता. 

(दूरवर दिसणारा शिवसागर जलाशय)

 उजवीकडे गडावरील कुठलासा बुरुजसदृश भाग होता, तर डावीकडे बाबुकडा होता. थोड्याच वेळात दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसू लागल्या, ज्या आपल्याला उध्वस्त प्रवेशद्वाराशी आणून सोडतात. गडावर समोरच लगेच आणखी एक हनुमंताचं देऊळ आहे. 

पाया पडून सगळं ग्रुप समोर मोठं झाड, सावली पाहून बॅगा टाकून विसावा आणि जेवणासाठी जमा झाला. येताना आपापला आणलेला खाऊ  आणि ऑर्गनायझर्सनी दिलेली थेपल्याची पाकिटं उघडली गेली. बघता बघता सर्वांनीच जे काही होतं.. बिस्किटं, चिवडा सगळ्याचा अक्षरशः फडशा पडला. अशा प्रोफेशनल ग्रुप्स सोबत येण्याचे काही फायदे-तोटे असतातच... काही subgroups बनले ते इतरांशी फार काही बोलत नव्हते...तर एकटे दुकटे पण बोलके लोक.. नवीन ओळखी करून घेत होते...शेअर करत होते.

            अर्ध्या-पाऊण तासाच्या विसाव्यानंतर उत्तरेकडील बुरुजाकडे निघालो. वाटेत महादेवाचं पुरातन मंदिर आहे, दर्शन घेतलं. अगदी पक्कं बांधकाम आहे अजूनही. कित्येक उन्हाळे-पावसाळे झेलत उभं असावं. वेगवेगळ्या अँगलने फोटोज घेतले. 

(गडावरचं शिवालय)

       मंदिराच्या बाजूलाच एक भग्न वास्तू दिसते, वाडा असावा अथवा दरबार ठिकसं काळात नाही. पण तिथे बरंच गवत माजलेलं दिसतं. पुढे  बुरुजावर जाऊन आजूबाजूचा परिसर न्याहाळताना सह्याद्रीच्या रौद्रतेची जाणीव होते. एका बाजूला 'शिवसागर' जलाशय, जंगल आणि तीन बाजूंनी सह्याद्रीचे उंचच उंच डोंगर आणि त्याचे खोल -सरळसोट कडे... बुरुजाच्या उत्तरेला एक पॉईंट आहे, तिकडे जाताना एक ४-४.५ फुटाच्या दगडी कमानीतून जावे लागते. शेवटच्या पॉईंटवरून वायव्येकडे 'नागेश्वर' मंदिर/डोंगर दिसतो. तिथे एकसारखे २ सुळके दिसतात. एक 'नागेश्वर' आणि एकाला 'खोटा नागेश्वर' म्हणतात अशी काही माहिती तिथे असणाऱ्या एकाने दिली. त्याच दिशेला 'महिमंडणगड' असल्याचंही त्या व्यक्तीने सांगितलं. 

(लांब दिसतोय तो नागेश्वर आणि अलीकडचा खोटा नागेश्वर)

इथे एक जाणवतं ..रायगड, राजगड, तोरणा, सिंहगड, लोहगड वगैरे किल्ल्यांवर भक्कम बांधलेले बुरुज, माच्या, तटबंदी दिसतात, तसं इथं फार दिसत नाही. मुख्यतः टेहळणी आणि कारागृह म्हणून ह्या किल्ल्याचा वापर होत होता असं वाचण्यात आहे. 

(एक पॅनोरमा)

             हनुमान मंदिराकडे परतीची वाट धरली, वाटेत बुरुजावर ग्रुपचा फोटो झाला. तिथेच ऑरगनायझर मधील एक विशाल भिलारे ह्या मित्राने, आपल्या छत्रपतींची शिवगर्जना दिली. त्याच्या त्या खड्या आवाजात, वासोट्यावर, सह्याद्रीत एक वेगळाच उत्साह, जोश जाणवला. 

दोन क्षण डोळे मिटून, महाराजांचे, मावळ्यांचे पराक्रम आठवून, मनातल्या मनात वंदन करून, हनुमान मंदिराकडे निघालो. मंदिराची बरीच पडझड झालेली दिसते, मूर्ती तशी उघड्यावरच आहे, चौकट आणि चहूबाजूच्या भिंती तेवढ्या शाबूत आहेत. 

(हेच ते हनुमानाचं मंदिर)

आता मारुतीरायाच्या पाय पडत असू तर डावीकडची वाट आपल्याला गडाच्या दक्षिणेकडच्या बुरुजाकडे घेऊन जाते. तर उजवीकडे पण एक पाऊलवाट दिसते, ती एका वाड्याच्या अवशेषांकडे घेऊन जाते असं कुणीतरी तिथे सांगितलं. पण बरीच दाट झाडी दिसत होती आणि कुणी जास्त जाताना दिसलं नाही त्यामुळे आम्हीही विचार सोडला आणि मंदिराच्या डावीकडे पावलं वळवली.
              ५-१० मिनिटांत आपण चुन्याच्या घाण्यापाशी पोहचतो . पुढे काही क्षणातच पाण्याच्या टाक्या लागतात.  चुन्याच्या घाणा आणि लगेचच पाण्याचे टाक्या असण्याचे कारण म्हणजे गडावर कसलंही बांधकाम करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्या एकत्र करणं सोपं जावं.. टाक्या करताना मिळालेला दगड, चुना आणि पाणी. इथून पुढे काही फारशी अशी पायपीट करावी लागत नाही. वासोट्याचा शेवटचा बुरुज आहे हा, हाच तो 'बाबुकडा'. ह्या कडयाच्या नावाबद्दल काही ऐकण्यात नाही फार. समोरचा डोंगर जवळपास सारख्याच उंचीचा आहे पण... दोन्ही डोंगर एका खोल दरीने विभागले गेले आहेत.. हि दरी दूरवर तशीच पसरलेली दिसते. समोरचा हा डोंगर म्हणजे 'जुना वासोटा' असल्याचं सांगतात. त्याचा बराच भाग ढासळल्याचं स्पष्ट जाणवतं. हा जो ढासळेल भाग आहे, त्यामुळे 'U' आकार तयार झाला आहे आणि त्याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येत. (टीप- हरिश्चंद्रगड अजून पाहिलेला नाहीय पण कित्येक फोटो/व्हिडिओज पाहिलेत). हा भाग बघता क्षणी चांगलीच धडकी भरवतो. 

(इथे सह्याद्रीच्या रौद्रतेची जाणीव होते)

तिथे काही फोटोज काढले. दुपारचे ३ वगैरे वाजले असतील... ऊन बऱ्यापैकी होतं.. पुन्हा सगळा ग्रुप हनुमान मंदिरापाशी एकत्र येऊन, गड उतरायला सुरुवात केली. उतरताना फारसा त्रास नाही झाला..दीड दोन तासांत आम्ही बोटींच्या थांब्यापाशी होतो . लहान दिवस... एव्हाना उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. बोटीचा परतीचा प्रवास सकाळच्या मानाने शांततेतच झाला. 

 

मावळतीच्या दिनकराचं ते रूप..  शिवसागर जलाशयात... सह्याद्रीच्या कुशीत.. सामावताना विलक्षण मोहक दिसत होत..            

 मुक्कामाच्या ठिकाणी पोहचेपर्यंत अंधार पडला होता.. विभा बिश्तने बाकी जेवणाची वगैरे तयारी करून ठेवली होती. सगळ्यांना कडकडून भूका लागल्याच होत्या, सगळ्यांनी जेवणावर ताव मारला आणि आवराआवर करायला घेतलं. भयंकर थकवा आल्याने कधी बसमध्ये जाऊन बसलो आणि कधी बस निघाली, परतीच्या प्रवासाचं काही एक आठवत नाही. मध्यरात्री कधीतरी पुण्यात पोहचल्याचं आठवतंय.
             'ट्रेक वासोटा' हा एक सुंदर अनुभव म्हणून कायमच लक्षात राहील. बऱ्याचदा ट्रेक पावसाळ्यात ..हिवाळ्याच्या सुरुवातीला होतात...ह्या ट्रेकमध्ये सह्याद्रीचं वेगळं रूप पाहायला मिळालं... मुख्य म्हणजे बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण झाली होती, इतक्या जवळ असूनही न जाता आल्याची खंत होती, ती दूर झाली. 

Wednesday, May 17, 2017

खांडस (कर्जत) ते भीमाशंकर- एक रोमांचकारी अनुभव

         जून महिन्यानुसार जावं तर तसं पावसाळा सुरु झाला होता, पण चालू झालाय असं मात्र म्हणता येत नव्हतं. बऱ्याच दिवसांपासून एक मस्त ट्रेक आम्हाला खुणावत होता, कर्जत ते भीमाशंकर....जूनमध्ये ह्या भागात पाऊस असणारच हे माहित असल्यामुळे तयारीला लागलो...चाल-ढकल, रुसव्या-फुगव्यानंतर अखेर ११-१२ जुलै तारीख ठरली. राहुल्याने कल्टी मारलीच...७ जण होतो - प्रण्या, सुम्या, योग्या, सुह्या, साग्या, स्वप्न्या(खास ट्रेकसाठी कोल्हापूरहून) आणि मी. सकाळी जितक्या लवकर निघता येईल निघणं भाग होतं..६च्या  सिंहगडसाठी कुणी तयार होणार नाही माहित होतं, So, ७:५० ची 'प्रगती' पकडायची ठरलं. प्रण्या मुंबईहून कर्जतला येणार होता. पहिल्यांदाच ट्रेकला येणाऱ्या स्वप्न्याला, ट्रेकिंगचे अंतर वाढवून सांगून घाबरवण्याचे राहुल्याचे सारे प्रयत्न आम्ही हाणून पाडले.    
       सकाळी ६:१५ ला गजर वाजले, कसेबसे उठले सगळे....आदल्या रात्री कोरड्या खाऊची बरीच पाकिटं आणली होती.. बिस्किटं, भडंग, खारे शेंगदाणे, चिवडा वगैरे... त्यामुळं बॅगा जड झाल्या होत्या..७-७:१० झाले तरी सगळे घरात.. माझं आणि साग्याचं आवरलं होतं मग आम्ही पुढे जाऊन ट्रेनची तिकिटं काढायची ठरलं ...त्यानुसार आम्ही शिवाजीनगर स्टेशनला ७:२०ला आम्ही तिकिटं घेऊन तयार होतो पण रुमवरून मंडळी अजून निघाली नव्हती...आम्ही पुणे स्टेशनला आंबेडकर चौकात पोचलो...७:३०..७:३५..७:४०.. तरीही चौघं दिसेनात.. आता मात्र चिडचिड व्हायला लागली.. इतक्यात ते आले ..गाड्या पार्किंगमध्ये पार्क केल्या आणि अक्षरश:धावतच निघालो..बॅगा भरलेल्या असल्याने धड पळताही येईना.. त्यात अजून भर म्हणजे 'प्रगती' प्लॅटफॉर्मला already लागलेली...तसंच दादरवर धावत असताना गाडी थांबलेली दिसली तेव्हा कुठे हायसं वाटलं..पण  हा आनंद क्षणिक होता..पायऱ्या उतरेपर्यंत ट्रेन सुरु झाली..तसंच प्लॅटफॉर्मवर धावत धावत ट्रेन पकडू लागलो..पण 'प्रगती' म्हणजे खचाखच भरलेली  असते..पाय ठेवायलाही जागा मिळेना..तसंच कसंबसं चढलो.. सगळे वेगवेगळ्या डब्यात..साग्या-सुह्या एकत्र..योग्या, स्वप्न्या आणि सुम्या एकत्र आणि मी तिसरीकडेच..अशा भरगच्चं डब्यात, जवळ भरलेली बॅग सांभाळणं म्हणजे महाकठीण.. अशा तऱ्हेने आमच्या ट्रेकची सुरुवातच थ्रिल्लिंग झाली होती.. कामशेत गेल्यावर कुठं जरा बरं वाटायला लागलं..लोणावळ्यात बाकीच्या मंडळींना बसायला/कमीत कमी नीट उभा रहायला जागा मिळाली पण माझ्या वाट्याला काही ते सुख नाही आलं.. ट्रेनने लोणावळा सोडल्यावर जी हिरवाई.. ढग..धबधबे दिसू लागले तसा मूड बनायला सुरुवात झाली...      
(कर्जत स्टेशनाबाहेर काढलेला ग्रुफी )

(खांडस पासून प्रवास सुरु करतानाचं जंगल)
        ९:२०-९:३० च्या आसपास कर्जत स्टेशनला पोचलो..प्रण्या आधीच पोचला होता..स्टेशन बाहेर भरपेट नाष्टा केला.. स्टेशनबाहेर एक Groupfie काढून FBवर check-in करून खांडसच्या दिशेने पावलं उचलली...बाहेर बसस्टॅन्डवर काशिळकडे जाणारी येष्टी पकडली..काशीळमध्ये उतरून तिथून प्रवासी ट्रॅक्सने खांडसचा रास्ता धरला..त्या ट्रॅक्सने आम्हाला एका टपरीपाशी सोडलं...तिथला पाणचट मसाला चहा पिऊन...आरोळ्या ठोकत खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरुवात केली...जिथे चहा घेतला तिथून 'कलावंतीण महालाचा' बुरुज स्पष्ट दिसत होता, तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली..ट्रेक सुरु केला तेव्हा हा बुरुज डाव्या बाजूला होता, पण ट्रेकच्या आराखड्यानुसार तो उजव्या हाताला लागायला हवा होता.. त्यामुळे थोड्याशा संभ्रमावस्थेतच चालत होतो...सोबत आपली क्लिकोग्राफी चालू होतीच वेगळं सांगायला नको...फारफार तर २०-३० पावलं चाललो नसेल तोच जोराचा पाऊस सुरु झाला..तसंच चालणं चालू ठेऊन १५-२०मी.नी पहिला ब्रेक घेतला. तिथून ५च मिनिटांत गणपतीचं देऊळ लागलं ..काठेवाडीतलं..
(विश्रांती क्र.२ - गणपती मंदिर)
(काठेवाडीचं गणपती मंदिर)












    तिथं पोचल्यावर लक्षात आलं, आम्ही Default 'गणेश घाटा'लाच लागलोय कारण नेटवर search केल्याप्रमाणे खांडसमधून आम्हाला २ मार्ग होते 'गणेश घाट' जो डोंगरांना वळसा घालून आहे आणि 'शिडी घाट' जो अवघड व चकवा देणारा...पण थोड्या कमी अंतराचा आहे...  
        एव्हाना खांडस गावापासून बरंच पुढं आलो होतो...दूरपर्यंत कुठंच गाव दिसत नव्हतं..दिसत  होती ती फक्त दाट वृक्षराई  आणि उंचच उंच डोंगररांगा..बाप्पाच्या पाया पडून तिथून पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान केलं...मजल-दरमजल करत ..फोटो काढत..कुण्या हौशी आणि भल्या गिर्यारोहकांनी (ट्रेकर्स) फसव्या वळणांवर भीमाशंकरकडे जाणाऱ्या वाटेच्या दिशेच्या खुणांचा पाठलाग करत प्रवास चालूच होता. कधी घनदाट जंगल..इतकं कि पूर्ण अंधार जाणवायचा तर कधी उघडा माळ ..जिकडे छोटी-मोठी झुडपं असायची... तर कुठे डोंगरावरून वाहत आलेले सुंदर, खळखळत वाहणारे झरे...

(वाटेवरच्या वाटा)
(वाटेवरच्या वाटा)












 हे सारं काही चालण्याचा शीण घालवत होते. ह्या साऱ्या प्रवासातल्या ज्या पाऊलवाटा होत्या..त्या ही खूप सुंदर झाल्या होत्या...अगदी Wallpaper ठेवण्याजोग्या...
(एक निवांत क्षण - मागे कलावंतीण महाल )
        थोड्या वेळात 'कलावंतीण महाल' तथा पदरगडाच्या पायथ्याच्या पठारावर येऊन पोचलो. तिथे एका छोट्याशा घरात सरबत, चहा वगैरे घेऊन हा विश्राम आटोपला. हि जी टप्प्या-टप्प्यांवर छोटी-छोटी घरं असतात चहा म्हणा..ताक म्हणा..सरबत वगैरे पुरवणारी..हि खरोखरच साऱ्या आमच्यासारखा हौशी-गौशी ट्रेकर्ससाठी उपयोगाची ठरतात, ऊर्जा पुरवणारी.
(सरबताची वाट पाहताना- योग्याचा कॅमेरा इथेच पडला)
(शिडी घाटाचा कडा)

तर तिथून निघतच होतो,इतक्यात योग्याच्या कॅमेऱ्याला अपघात होऊन तो निकामी झाला..तसा तो थोडा उदास झाला..पण काही क्षणातच एक Photo काढण्याजोगा spot आला आणि साहेब pose देऊन ऐटीत उभे. आम्हालाही बरं वाटलं, आम्हीही भरपूर फोटो काढले आणि मार्गस्थ झालो. अजून बराच प्रवास राहिला होता..कलावंतीण महालाच्या पहाडाला वळसा घालून पुढे निघालो..वळसा घातल्या घातल्या जे निसर्गाचं रूप दिसलं ते पाहून आम्ही थक्क झालो. समोर उंच डोंगर , डाव्या बाजूला सरळ-थेट खाली दरीत जाणारा कातळ..उजवीकडे कलावंतीण महालाचा पहाड...निव्वळ अप्रतिमच ! थोडंसं नीट
(कलावंतीण महाल )
पाहिल्यावर लक्षात आलं..डावीकडं जो सरळ-थेट कातळ होता त्यात शिड्या दिसल्या..मग कळलं ते दुसरं-तिसरं काही नसून 'शिडी घाट' होता. आता शिडी घाट आणि गणेश घाट दोन्ही वाटा एकत्र येत होत्या.कधी भली मोठी जंगलातून जाणारी वाट-कधी फक्त एकजण जाऊ शकेल अशी  डोंगराच्या कडे-कडेने जाणारी वाट...प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर आला होता. अर्थातच 'Athlete प्रणव' सर्वात पुढे होता. ऊन-सावलीचा पाठशिवणीचा खेळ संपूर्ण प्रवासात चालू होताच.
(दाट झाडीतून वाट काढताना )
(एक मस्त फोटो)












शेवटचा टप्पा थोडासा अवघड होता...पावसामुळे निसरड्या झालेल्या..काहीशा तिरक्या उताराच्या वाटेने वरती चढायचं होतं..वातावरण तर खूपच मोहक झालं होतं..ढगांनी पूर्ण गर्दी केली होती...
(फोटो पाहून कल्पना येत असेल वातावरणाची :))
काही ठिकाणी धुकं होतं..खाली दूरवर पसरलेली हिरवाई..कुठे ढगांत गुडूप होणारे डोंगर..विहंगम दृश्यच ते..हा टप्पा पार केला आणि भीमाशंकराच्या डोंगररांगेच्या माथ्यावर येऊन पोहचलो..वर अजिबात काही समजत नव्हतं कि काही दिसत नव्हतं..फक्त  आकाराची झाडी,पाण्याची तळी..आणि धुकं..अशातच दिसणाऱ्या पाऊलवाटेनं आम्ही १०-१५ मि. चालल्यावर आम्ही ज्योतिर्लिंग शंभू महादेवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो..तिकडे फोटो काढला,पण सगळेच जण थकलेले असल्यामुळे सर्वानुमते दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर दर्शन घेण्याचा ठराव पास करून मुक्कामासाठी जागा शोधायला निघालो...      
(प्रवेशद्वार)

       


(दिशादर्शक फलक)
     प्रण्या-योग्या MTDC चं resort वगैरे आहे का पाहायला गेले, बाकीचे सारे तिथेच पार्किंग पाशी रस्त्याच्या बाजूलाच ठाण मांडून बसलो..जसजसा अंधार वाढू लागला तसतसं हवेतला गारवा वाढला..सुहयाला आदल्या दिवशी ताप होता म्हणे पण एवढ्या प्रवासानंतर पण त्याच्या चेहऱ्यावर तसा काहीच लवलेश नव्हता. पण कसं काय कुणास ठाऊक, मलाच हुडहुडी भरायला लागली..त्यात अंगावर ओले कपडे..खोल्या मिळाल्यानंतर तिकडे जाईपर्यंत तर तापमान बरंच वाढलं.. खोलीत गेल्या-गेल्या अंगावरचे भिजलेले कपडे, मोजे-बूट काढून हात-पाय धुवून सगळे तसेच खाटांवर आडवे झाले..गप्पा-टप्पा सुरु केल्या होत्या..मी आपला मिळेल ते पांघरूण-टॉवेल घेऊन ऊब मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. एव्हाना सर्वाना भूका लागायला लागल्या होत्या. सर्वजण गप्पांच्या ओघात किती वाजलेत विसरले होते. रात्री ९-९:१५ नंतर जेवायला निघालो..मला तापामुळं काय खायची इच्छा होत नव्हती पण सगळ्यांनी 'खाल्ल्यावर बरं वाटेल'चा सूर लावल्यावर कसाबसा निघालो..अंगात अवसानच नव्हतं..गावात एवढ्या रात्री मोजकीच हॉटेलं चालू होती..एक सापडलं आणि ठीकठाक वाटणारं होतं. बऱ्याच विचार-विनिमयानंतर शेवभाजी आणि पनीरची कुठलीशी भाजी ऑर्डर केली...अपेक्षेप्रमाणे एकाच मसाल्यात दोन वेगवेगळ्या भाज्या आणल्या आम्हीही त्या रिचवल्या आणि माघारी खोलीवर आलो..
          खोलीवर जसा आलो तसा, सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरंच माझा ताप कुठल्या कुठे पळाल्या..आल्या आला आराम झाल्यामुळं आणि आता पोटं भरल्यामुळे सगळेच जण एकदम फ्रेश झाले होते. मी पुण्यातून रुमवरून निघताना पत्ते आणलेच होते..मग काय रमी , मुंगूस, चॅलेंज..बदाम सात वगैरे नावं सुचवली गेली आणि साधं सोपं 'बदाम सात'वर Done झालं. एक-एक डाव खेळता-खेळता..मैफिल रंगली..सोबत एकमेकांची उणी-दुणी..मापं काढणं..टोमणे मारणं आपलं चाललेलंच. रात्र जशी मध्यरात्रेकडे सरली..तसं काहीजण वेगळं काही खेळुयात म्हणाले..अस्मादिकांनी (स्वतः) आपला आवडता 'दमशेराज' सुचवला आणि मान्य करवून घेतला. स्वप्न्याला काय प्रकार जास्त माहित नव्हता.पण खेळ पुढे गेला तसे सगळेच खेळात Master झाले. दमशेराज खेळताना आपल्या संघातल्याला Movie च नाव समजावताना Hindi/Marathi..Latest/Old..Hero/Heroine कोण समजावताना काही नवनवीन अशक्य क्लृप्त्या सुचवल्या गेल्या..हाहाहा .. जे तेव्हा होते आणि हे वाचतील त्यांना चिक्कार हसू येणार आहे..आणि कायम जेव्हा कधी आठवेल तेव्हाही..२:३०-२:४५ च्या आसपास कुठे खेळ थांबवला गेला..सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून फक्त..साग्या तसा सवयीनं थोडा आधीच कलंडला होता.. आम्हीही टवाळक्या करत करतच झोपी गेलो...
          सकाळी लवकर कधीतरी प्रण्या उठला..आवरलं आणि सगळ्यांना एकएक करून उठवलं..सगळे कसंबसं उठले आणि आवरू लागले.. एवढ्यात त्याचा चहा-बिस्किटाचा एक round झाला होता..आम्हीही पटापट आवरण घेतलं..नेहमीप्रमाणे शेवटी मीच होतो अर्थात सगळं सामान नीट घेतलं कि नाही..खोलीतलं सामान जागेवर गेलं कि नाही..हे सर्व पाहण्यात बराच वेळ गेला. एव्हाना कालपासून बॅगा जरा हलक्या झाल्या होत्या..थोडी बिस्किटं भडंग खारे शेंगदाणे वगैरे संपलं होतं..खोलीपाशीच प्रण्यानं टपरी बघून ठेवली होती, तिथं ठीकठाक पोहे आणि बेचव चहा संपवून ..'आधी पोटोबा मग विठोबा'(इथं महादेव :P) नुसार बॅगा खोलीवर ठेवून दर्शनाला गेलो..बऱ्यापैकी गर्दी होती..पण जितकी ९-१० नंतर असते तितकी नव्हती..सोबत झिरमिर पावसाची धार होतीच..'मंदिरासमोरची  चिमाजीआप्पानी वसईच्या विजयानंतर आणलेली घंटा' ह्या विषयावर अस्मादिकांकडुन Knowledge पाजळून झालं..आणि 'भीमाशंकराच्या' पाया पडून..मंदिर परिसरात थोडेफार फोटो काढून..माघारी खोलीवर आलो..
(मंदिरातली घंटा )
(मंदिराचं शिखर)












    आता बघायची ठिकाणं ३ होती..नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर आणि भीमेचं उगमस्थान..ह्यात सुरुवात नागफणी पॉईंटपासून करायची ह्यावर एकमत करून बॅगा उचलल्या..खोलीचं भाडं वगैरे खर्च देऊन नागफणीकडे कूच केलं..            
         हा नागफणी पॉईंट, मंदिराच्या ईशान्येकडे गेल्यावर लागतो.हा पॉईंट म्हणजे त्या परिसरातलं सर्वोच्च शिखर आहे (बहुदा)..भीमाशंकरच्या घनदाट अभयारण्यातून जावं लागतं ...आणि हा शिखराचा भाग बाकीच्या डोंगरापासून नागाचा फणा उचलल्याप्रमाणे दिसतो म्हणून त्याला नागफणी पॉईंट म्हणत असावेत. जसं भीमाशंकर मंदिराचा परिसर सोडून नागफणीकडे निघालो, तसं रहदारी/गर्दी कमी होत गेली...खरंतर आम्ही वाट दिसेल तसं फक्त समोर नागफणीचा डोंगर पाहून चालत होतो. काही Duke, Bullet तत्सम दुचाकींवरून दुचाकीस्वार आम्हाला पार करून पुढे गेले. एक छोटा टप्पा पार केल्यावर आम्ही अशा ठिकाणी  पोचलो, जिथून पुन्हा गर्द झाडी सुरु होणार होती. मागला टप्पा तसा छोट्या-मोठ्या झुडपांचा होता. उजवीकडे २ माध्यम आकाराच्या टेकड्या आणि समोर दूरवर पसरलेलं घनदाट जंगल. झाडीतून येणारा किर्रर्र आवाज...अधून मधून येणारे प्राण्यांचे आवाज...एक गूढ वातावरण तयार करत होते...
(नागफणीकडे जाणारी वाट)
स्वप्न्या थोडा आधीच घाबरला होता...१५-२० पावलं चाललो नसेल तोवर एक माकड रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसलं..तसं मंदिराच्या आसपास भरपूर माकडं असतात पण हे माकड आम्हाला पाहून झाडीत पळून गेलं. आम्ही तसंच पुढं चालत निघालो असतानाच अचानक चित्र-विचित्र आवाज करत छोटी-मोठी ५-६ माकडं झाडांवरून जमिनीवर उड्या मारत आली. जणू मघाशी बाकीच्यांना सावज आलं असल्याची वर्दी द्यायला ते गेलं होतं. काही कळायच्या आत त्यांनी आमच्या हातातल्या पिशव्यांकडे धाव घेतली. सुमितच्या हातात एक मोठी प्लॅस्टिकची पिशवी होती, ती त्यांनी हिसकावली. तो प्रकार पाहून सगळ्यांचीच टरकली. सगळ्यांनी आलो त्या वाटेने उलट्या दिशेने धूम ठोकली आणि त्या मोकळ्या ठिकाणी आलो, जिथून जंगल सुरु होतं.
         आता मात्र स्वप्न्या आणि साग्या दोघांनी पुढे येण्यास पूर्णपणे नकार दिला. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा निर्णय झाला होता. अखेर त्या दोघांशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
(भडंग, बिस्कीट, शेंगदाणे इत्यादींचा फडशा पाडणारी टोळी )
साग्या-स्वप्न्या भीमाशंकरकडे आणि आम्ही पुन्हा जंगलाकडे निघालो. ज्या ठिकाणी माकडांनी हल्ला चढवला होता त्या ठिकाणी आलो. पाहतो तर काय, माकडं भडंग, शेंगदाणे आणि बिस्किटं फस्त करत होती.ती मोठी पिशवी उचलली, त्यातील कपडे आहेत ना ह्याची खात्री करून पुढे निघालो. चालत-चालत आम्ही एका मठापाशी येऊन पोचलो. तिथून आता डोंगर चढायचा होता. मठापासून १५-२०मिनिटांत आम्ही नागफणीच्या शिखरावर पोचलोपण.
           वरती अप्रतिम वातावरण होतं, चोहोबाजूंकडे फक्त पाहतच राहावं इतकं सुंदर दृश्य होतं. ज्या बाजूनं वर  चढलो तिकडे झाडी आणि समोरच्या बाजूला थेट खाली - सरळ नेणारा डोंगरकडा/दरी...आणि तेव्हा कळलं ...काल जिथून आम्ही आलो होतो, तोच तर भाग होता तो...म्हणजे खांडस गाव समोर दिसत होतं, डावीकडे 'कलावंतीण महाल' दिसत होता...आणि काल जो जो कडा खालून पाहत होतो तो हाच .. नागफणीचा...मनसोक्त फोटो काढले...अगदी भरपूर...
(नागफणीवरून दिसणारं खांडस गाव )
(नागफणीचा कडा)
(नागफणीचा कडा आणि उजवीकडे कोपऱ्यात कलावंतीण महाल )
          एव्हाना स्वप्न्या-साग्याशी काही संपर्क होऊ शकला नव्हता, येष्टीस्टँडपाशी पोचले असावेत असं समजून आम्ही निघालो. अर्ध्या-पाऊण तासात आम्हीही तिथे पोचलो. बरीच पायपीट झाल्यामुळे आता अजून कुठे जायची कुणाची स्थिती वाटत नव्हती, भीमेचं उगमस्थान तेवढं जवळंच असल्यामुळं ते तेवढं पाहायला निघालो...
(भीमेचं उगमस्थान)
            भीमाशंकर देऊळाकडे जाण्यासाठी जे  प्रवेशद्वार आहे तिथून एक कच्ची पायवाट जाते, जी अगदी त्या उगमस्थानापाशी आणून सोडते. भीमेचं उगमस्थान म्हणजे काय ...तर एक छोटंसं मंदिर आणि समोरच एक छोटं कुंड, जिथून प्रवाह पुढे जातो..
              परतीचा प्रवास आता सुरु झाला होता. नाही म्हणायला एक हुरहूर राहिली होती...महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेली, शेकरू खार(Indian Giant Squirrel, जी भीमाशंकरमध्ये पाहायला मिळते) काही दिसली नाही कुठं ह्या ट्रीपलाही... येष्टीस्टॅण्डवर आलो. मुंबई (कि कल्याण)ची गाडी लागलीच होती. प्रण्याने धावत जाऊन पकडली. ती येष्टी पुण्यावरून जाणारी नव्हती(बहुतेक). पण राजगुरूनगरपर्यंत जाऊन तिथून मग अगदी पीएमटीपण मिळतात. मग आम्हीपण त्याच येष्टीत चढलो. ठरल्याप्रमाणे राजगुरूनगरला प्रण्याला 'टाटा बाय बाय' करून उतरलो. सगळे अगदीच थकले होते, So, चहा-कॉफी घेऊन मरगळ झटकून पुण्याची गाडी पकडली..
               आज जवळपास २ वर्ष झाली, ह्या वर्षासहलीला...पण खांडसगावापासूनचा भीमाशंकरपर्यंतचा प्रवास.. रात्रीचा मला भरलेला ताप...रात्री २-२.३० पर्यंत रंगलेले बदाम ७, दमशेराजचे डाव...नागफणी पॉईंटचं विहंगम दृश्य...सगळं डोळ्यांसमोर क्षणात उभं राहतं...